🔽बारा तास सुरळीत वीज पुरवठा आणि रब्बी धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी
साखरीटोला/सालेकसा-:
सध्या पावसाळी हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांची खरीप पिकांच्या पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळीच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे आणि पाणीपुरवठा करणे अत्यंत कठीण झाले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निवेदन देऊन मतदारसंघात त्वरित १२ तास सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्र्यांना दोन स्वतंत्र निवेदने दिले असून मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या प्रमुख अडचणींना वाचा फोडली आहे. पहिल्या मागणीमधे सुरळीत वीज पुरवठ्यासाठी आदेश देण्याची विनंती
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये खरीप पेरणीचा काळ सुरू झाला आहे. अशा महत्त्वपूर्ण वेळेत सातत्याने वीज खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांना पाणी देणे कठीण झाल्यामुळे नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही अडचण लक्षात घेता संबंधित वीज वितरण अधिकाऱ्यांना या भागात दररोज किमान १२ तास अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत त्याच प्रमाणे
दुसऱ्या मागणीमधे रब्बी धान खरेदीची मर्यादा (लिमिट) वाढवून मिळावी असे नमूद असून गोंदिया जिल्ह्यातील रब्बी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आहे. यंदा गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर धान (भाताचे) पीक घेण्यात आले आहे. परंतु, शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर सोसायट्यांचे खरेदीचे उद्दिष्ट (लिमिट) अत्यंत कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपले हक्काचे धान्य विकताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोसायट्यांची खरेदी उद्दिष्टे वाढवून दिल्यास शेतकऱ्यांना आपला रब्बीचा धान सुलभतेने आणि योग्य दरात विकता येईल. त्यामुळे शासनाने तात्काळ रब्बी हंगाम २०२६ साठी धान खरेदीची मर्यादा वाढवून द्यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देते वेळी आमदार संजय पुराम यांचे सोबत गोंदिया जिल्हा भाजप अनुसूचित जाती आघाडीचे महामंत्री डाँ. राजेंद्र बडोले उपस्थित होते. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज आणि पिकवलेल्या रब्बी धानाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याने, आता शासन यावर सकारात्मक निर्णय घेणारच अशी आशा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.



