🔽आधार ई-केवायसी होत नसल्याने सालेकसा तालुक्यातील वयोवृद्ध नागरिक शासकीय योजनेपासून वंचित
साखरीटोला/सालेकसा -:
अनेक जेष्ठ नागरिकांचे बँकेत
बँक खाते आहे मात्र आता ई-केवायसीच्या वेळेस वयोमानानुसार बोटांचे ठसे उमटत नसल्याने लिंकींग होत नाही त्यामुळे आधार क्रमांकच धोक्यात आलाय. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी गेले काही दिवस बँक, ते तहसील कार्यालय, व आधार सेंटर इकडून तिकडे हेलपाटे घालून वैतागलेल्या वयोवृद्ध नागरिकांनी हताशा व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून आधार कार्ड वेगवेगळ्या योजनांना जोडण्याचा धडक कार्यक्रम सुरू आहे. मात्र, जेष्ठानां प्रत्यक्षात ई-केवायसी करताना अनेक व्यावहारिक अडथळ्यांचा सामना करावे लागत आहे. अनेक वृद्ध नागरिकांना त्या कामात अडचणी येत आहेत. आधारची ई-केवायसी करण्यासाठी बोटांचे ठसे जुळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे वयोमानामुळे पुसट झाले आहेत. त्यामुळे आधार पडताळणी यंत्रांवर ठसे उमटत नाहीत. ई-केवायसी नसल्याने डीबीटी पद्धतीने त्यांच्या बॅंक खात्यात आलेले निराधार योजनेचे मानधन परत सरकार जमा झाले आहे. त्यामुळे वृद्ध नागरिक हताश झाले असून अशा परिस्थितीत 70 वर्ष ओलांडलेल्या नागरिकांनी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे, असा सवाल ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जेष्ठ मंडळीत संतापाची लाट उसळली आहे. 70 वर्षांपुढील पुरुष व महिलांचे ठसे उमटणे कठीण झाले आहे. बोटांचे ठसे उमटत नाही अश्या अनेकांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात शासन व प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करावे, आधार अपडेटसाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत मशिन उपलब्ध करावे किंवा वृद्धानां ऑफलाईन मानधन द्यावे अशी मागणी आहे.



