वार्तापत्र– रमेश चुटे साखरीटोला/सालेकसा
सध्या संपूर्ण देशासह ग्रामीण पातळीवरही तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि सातत्याने वाढणारे तापमान (ग्लोबल वर्मिंग) नवीनच निर्माण झालेला “एल निनो” ही केवळ पर्यावरणाची समस्या राहिलेली नसून, ती आता पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. या वाढत्या उन्हाच्या झळा आणि बदलत्या हवामानाचा मानवी जीवनासह निसर्गावर काय परिणाम होत आहे, आणि यावर काय उपाययोजना करता येतील, याचा घेतलेला हा आढावा. गेल्या काही वर्षांत उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढली आहे. जून महिना संपत चालला तरी तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पार जात आहे. शहरीकरण आणि रस्ते विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड हे यामागचे मुख्य कारण असू सकते. पण सोबतच कल कारखाने, वाहने, यांमधून निघणारा धूर आणि प्लास्टिकचा अतिवापर यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. घातक वायू हवेत साचून राहिल्याने सूर्याची उष्णता पृथ्वीबाहेर जाऊ शकत नाही, ज्यामुळे पृथ्वी शेगडीसारखी तापत आहे. या वाढत्या तापमानाचा फटका केवळ माणसालाच नाही, तर संपूर्ण जीवसृष्टीला बसत आहे.
मानवी आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत असून उष्माघात त्वचेचे आजार, आणि थकवा येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला या रखरखत्या उन्हात काम करणे कठीण झाले आहे. नद्या, विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडत चालल्या असून भूजल पातळी खालावली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यजीव गावांकडे धाव घेत आहेत. उष्णतेमुळे पाळीव जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून दुग्धोत्पादनावरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि प्रचंड उष्णता यामुळे पिकांचे चक्र बिघडले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. निसर्गाचा हा प्रकोप थांबवायचा असेल, तर आता केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे:
’झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहीम केवळ शासकीय स्तरावर नव्हे, तर लोकचळवळ म्हणून सुरु व्हावी, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून लावलेली झाडे जगवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असावी. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या अंतर्गत सिमेंट नाला बांध, बोडी दुरुस्ती आणि नदी पुनरुज्जीवन यांसारखी कामे गतीने व्हावीत. पारंपरिक विजेचा वापर कमी करून सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवावा लागेल, प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावेच लागणार आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल पुढील जीवसृष्टीसाठी धोक्याची घंटा असून जर आपण आताच निसर्गाचे रक्षण केले नाही, तर येणारा काळ आणखी भीषण असेल. पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे आणि वसुंधरेला पुन्हा हिरवेगार करणे हाच यावर एकमेव उपाय आहे.” वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही एकत्र येऊन पर्यावरणपूरक पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे.


