दिल्लीः- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रूपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. सध्या या नोटा व्यवहारात सुरूच राहणार आहेत. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बंद केल्या जातील. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. लक्षणीय बाब म्हणजे आता २००० च्या नोटांची छपाई बंद होणार आहे.आरबीआयने सांगितले की, २३ मे पासून एकावेळी केवळ २० हजार रूपयांच्याच २ हजाराच्या नोटा बदलू किंवा जमा करू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकीची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय आरबीआय नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी १९ शाखा उघडणार आहे. RBI ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती.
═══════════
२ हजाराच्या नोटा कधीपासून सुरू झाल्या?
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. नोटबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते. यावर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सरकारने विचार न करता हा निर्णय घेतल्याची टीका केली होती.